Tuesday, September 20, 2016

मराठी भाषेचे महत्व

`पिकते तिथे विकत नाही' असे म्हणतात. तसेच महाराष्ट्रात राहून `मराठी' भाषेचे महत्त्व तितके जाणवत नाही! आई समोर असताना आईचे महत्त्व जाणवते का? आपण जेव्ह परप्रांतात काही काळासाठी जातो व सतत जेव्हा ती परप्रांतीय अनोळ्कि भाषा कानावर पडू लागते. तेव्हा आपण आपली मातृभाषा ऐकण्यासाठी कासावीस होतेओ. चुकून अपली भाषा बोलणारी , अनोळखी मंडळी दिसली तर ती माणसे अनोळखी असूनही खूप आपली वाटतात! हे भाषेचे अदृश्य धागे!
आता थोडी गंमत पहा! ही भाषा दर पंचवीस किलोमीटरवर वेगळी भासते. आपण कोल्हापुरला गेलो तर तिथे मराठी भाषा खणखणीत, स्पष्ट आणि नेमकी वर्मावर बोट ठेवणारी! तिथल्या स्त्रियाही म्हणतात, "आम्ही आलो! आम्ही जातो, मी जातो!" साताऱ्याला थोडा भाषेतला स्पष्टपणा नरम होतो. लंवगी मिरचीचा झटका जाऊन साताऱ्याच्या जर्द्याची गुंगी त्यात डोकावते, तरी पण "लई" "चिक्कार" `आयला' `लिका' वगैरे खास सातारी ढंगच! कोकणात भाषा अगदी मऊसूत होते. "ळ" चा उच्चार `ल'? "शाला" "फला" उच्चारही अगदी खालच्या स्वरांत, तोंडातल्या तोंडात शब्द, जणू, मासाच डुबकी घेतोय पाण्याच्या आतबाहेर! कोकणात एकदा मी एका कामगारास आपलेपणाने म्हणालो,"काय लेका!" तर त्या कामगाराचे एकदम पित्तच खवळले. तो म्हणाला, "लेका, म्हणू नका ती शिवी आहे!" माझी तर जीभ टाळूलाच चिकटली. तेव्हापासून मी कानाला खडा लावला. भाषेचे काही खरे नसते. कुठए एखादा शब्द ओवी ठरतो तर कुठे शिवी! भरवसा नाही !! तिकडे धुळे, मालेगावात तर मराठी भाषेवर "अहिराणी भाषेचा" प्रभाव! उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!'
असो, नदी वहाताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्य भागात नवी लय धारण करते. पण मूळचा गाभा मात्र तोच. संत ज्ञानेश्वरांनी छातीठोकपणे सांगितल्याप्रमाणे, `अमृताशी पैजा जिंकणारा' गोडा पवित्र आणि रसरशीत ! अशा `मायबोली मराठीस' करावेत सर्वांनीच अनंत प्रणाम!